ताज्या बातम्याराजकियराज्य

आम्हाला १,५०० रुपये नाही मिळाले तरी चालतील परंतु, आमच्या पिकांना हमीभाव द्या

शेतकरी महिलेची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात सभा व मेळावे घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) ‘शिवस्वराज्य यात्रा’ व महिला मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार गटातील लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या महिला मेळावे घेण्यात आघाडीवर आहेत. सुळे यांनी जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये महिला मेळावे घेतले. दरम्यान जळगावातील महिला मेळाव्यात बोलत असताना एका शेतकरी महिलेने सुप्रिया सुळे यांच्यासमोर विनंती केली की “आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १,५०० रुपये नाही मिळाले तरी चालतील. परंतु, आमच्या पिकांना हमीभाव द्या”. त्यावर सुप्रिया सुळे यांनी शेतकरी महिलांना आश्वस्त केलं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुम्हा शेतकऱ्यांना हवा असलेला हमीभाव आम्ही देऊ.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्यात प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. मला महागाईबद्दल येथे उपस्थित असलेल्या महिलांचं मत जाणून घ्यायचं आहे”. त्यावर काही महिला बोलू लागल्या. त्यापैकी एका महिलेला सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मावशी तुम्ही बोला”. यावर एक शेतकरी महिला उभी राहिली आणि म्हणाली, “राज्यातला शेतकरी खड्ड्यात जातोय, शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या आणि दारूबंदी करा”. त्यावर सुप्रिया सुळे यांनी त्या महिलेला विचारलं, “तुम्ही कोणतं पीक घेता?” त्यावर ती महिला म्हणाली, “आम्ही कपाशी (कापूस) व सोयाबीन ही दोन पिकं घेतो”. त्यावर सुप्रिया सुळे यांनी त्या महिलेला विचारलं, “तुमच्या पिकाला हमीभाव मिळाला का?” सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर उत्तर देताना ती महिला शेतकरी म्हणाली, “तेच दुःख सांगतेय, आम्हाला १,५०० रुपये मिळाले नाही तरी चालतील, पण आमच्या पिकांना हमीभाव द्या.” शेतकरी महिलेची व्यथा ऐकून सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पाहिलंत का आमची माऊली काय म्हणतेय. तिला १,५०० रुपयांपेक्षा पिकांना हमीभाव महत्वाचा आहे.”

खासदार सुळे म्हणाल्या, “विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा एकदा प्रचाराला तुमच्या गावात येईन. परंतु, मी आत्ताच सांगते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आमचे मुख्यमंत्री सर्वात पहिला निर्णय कुठला घेतील तर तो तुमच्या हमीभावाबद्दल असेल. तुमच्या पिकांना हवा तसा हमीभाव देण्याची जबाबदारी मी घेते. याशिवाय सरकारने जी योजना चालू केली आहे त्या अंतर्गत तुम्हाला तुमचे १,५०० रुपये मिळत राहतील. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही कोणत्याही पक्षाला, कोणत्याही उमेदवाराला मतदान करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. तुम्ही कोणाला मतदान करावं याची कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. ती कोणाची मक्तेदारी नाही. तुम्हाला वाट्टेल त्याला मतदान करा. मतदानाबाबत कोणी तुम्हाला धमकी दिली तर मला फोन करा, त्याचा प्रेमाने करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ते मी पाहते. मात्र तुम्ही धमक्यांना बळी पडू नका”.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close