पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी कामाला लागल्याचे दिसत आहे. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. आज पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाइलवर स्वाक्षरी केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी करण्यासाठी पीएम मोदींनी फाइलवर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार असून अंदाजे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जातील.
फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करायचे आहे. आमचे सरकार यावर सतत काम करत आहे आणि भविष्यातही ते करत राहील. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जातात.
पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?
केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जातात. प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एकदा पैसे पाठवले जातात.



