राज्यसातारा

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचा सर्वांगीण विकास आमदार अतुल भोसले यांचा अधिवेशनात निर्धार

कराड : स्व.यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासदृष्टीला दिशा देणाऱ्या कराड नगरीत पुन्हा एकदा विकासाचा ठाम आवाज घुमला. कराड हे पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याने येथे वाढती वाहतूक, औद्योगिक मालवाहतूक आणि ग्रामीण भागातील दैनंदिन ये-जा यामुळे शहरावर प्रचंड ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधिमंडळाच्या सभागृहात कराडकरांच्या भावनांना साद घालत स्वतंत्र ‘नेकलेस रोड’साठी ठाम आणि अभ्यासपूर्ण मागणी पुन्हा एकदा मांडली.

या मागणीसोबतच त्यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यभूमी असलेल्या प्रीतिसंगम परिसराच्या सर्वांगीण विकासाचा विषय विशेषत्वाने उपस्थित केला. कृष्णा–कोयना संगमस्थळी वसलेले समाधीस्थळ हे केवळ स्मारक नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे प्रेरणास्थान आहे. या पवित्र स्थळाचा विकास हा केवळ भौतिक प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या अभिमानाशी जोडलेला भावनिक विषय आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

आ. भोसले यांनी पूरसंरक्षण भिंत, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि पर्यटनवाढ यासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी देण्याची आग्रही मागणी केली. वारंवार येणाऱ्या पुराच्या धोक्यामुळे परिसराचे संरक्षण अत्यावश्यक असून, सुरक्षित आणि आकर्षक रिव्हरफ्रंट उभारल्यास कराड शहराला नवे आर्थिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेकलेस रोडमुळे शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, पर्यायी मार्ग उपलब्ध होईल आणि नागरिकांना सुकर प्रवासाचा दिलासा मिळेल. यासोबतच संगम परिसराचा विकास झाल्यास धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरण पर्यटनाला मोठी चालना मिळेल. स्थानिक व्यावसायिक, लघुउद्योग आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे स्पष्ट करत त्यांनी विकासाचा सर्वसमावेशक आराखडा सभागृहासमोर मांडला.

स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिलेली विकासदृष्टी, सहकार चळवळीचे बळ आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची परंपरा लक्षात घेता, त्यांच्या समाधीस्थळाचा विकास हा त्या विचारांना साजेसा असावा, असे भावनिक आवाहन आ. भोसले यांनी केले. कराडच्या अस्मितेशी निगडित हा विषय केवळ स्थानिक प्रश्न नसून राज्याच्या गौरवाचा भाग आहे, असे ते म्हणाले.

कराड व परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा, शहराच्या भविष्यातील गरजा आणि ऐतिहासिक वारशाचा सन्मान या तिन्हींचा सुंदर मिलाफ साधणारी ही मागणी आत्मविश्वासाने आणि ठामपणे मांडत आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विकासासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. कराडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा प्रकल्प निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी सभागृहात केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close