
कराड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला हे उघड झालेले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदारयादी मधील गैरप्रकाराबाबत वेळोवेळी संसदेत मांडणी केली आहे. तसेच या विषयाबाबत नुकताच त्यांचा लेख महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये छापून आलेला होता. याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण मीटिंग दिल्ली येथे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडली. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप हे सदस्य आहेत तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत.
मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केलेली आहे. पण आयोगाने अद्याप समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत असून मतदार याद्यांमध्ये मोठया प्रामणात घोटाळे केले जात आहेत. हे सर्व रोखण्यासाठी ही समिती अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल.