राजकियराज्यसातारा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात मोठी ताकद : आ. सतेज पाटील

कराड : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात. त्यांच्याकडे स्वकर्तृत्व सांगण्यासारखे काहीच नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मताच्या रूपाने पाऊस पाडून उभे रहा. विरोधात पैसे पसरणाऱ्यांचा कंडका पाडा. असा कोल्हापूरी रांगडी भाषेत माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी घणाघात केला.
कराडमधील विठ्ठल चौक व आंबेडकर चौकात झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी प्रकाश नहाटा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खा. चंद्रकांत हंडोरे, उदयसिंह पाटील – उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, शशिराज करपे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण,  कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, विठ्ठल शिखरे, अमित जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, बाळूताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. सतेज पाटील म्हणाले, पृथ्वीराजबाबांना पुन्हा सहकार्य करावे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, पी. डी. पाटील यांनी कराडला पुढे नेले. पृथ्वीराजबाबांनी ही कराडची ओळख विकासात्मक कार्यातून पुढे नेली. त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा आढावा घ्यायचा तर खूप मोठी यादी आहे.
ते म्हणाले, कोविड काळानंतर काँग्रेस व महाआघाडीचे सरकार स्थिर होतेय तोच एकनाथ शिंदे पळून गेले. पृथ्वीराजबाबा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचे कोणतेही काम डावलले नाही. परंतु एकनाथ  शिंदे यांच्याकडे मलकापूर नगरपरिषदेच्या इमारतीसाठी किमान पाचवेळा मनोहर शिंदे यांना घेवून मी गेलो. तरीही त्यांनी हे काम केले नाही. आमचे काम करताना एकनाथ शिंदे यांचा हात जड होतो, याचे वाईट वाटते.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, भाजप ही जातीधर्मातील द्वेष पसरवत आहेत. त्यांचा डाव आपण ओळखला पाहिजे.  खा. चंद्रकांत हंडोरे म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आयुष्यभर बहुजन हिताचा विचार जोपासला. त्यांचा विचार आणि ध्येय हे कराडच्या विकासासाठी कायम राहील. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील व केंद्रातील भाजपचे सरकार शेतकरी, महिला व युवकांच्या विरोधातील आहे. शेतमालाचे भाव पडले आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. याचा आक्रोश करत लोकसभेत समाजातील सर्व घटकांनी भाजपच्या नेत्यांना दणदणीत पराभव दाखवला. व कॉंग्रेस आघाडीला ६५ टक्के लोकांनी कौल दिला. त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल. व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना प्रतिमहा तीन हजार रुपये देणार असून, शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्जमाफी व सुशिक्षित तरुणांना प्रतिमहा भत्ता देणार आहे. या योजना कुठेही सरकारी तिजोरीवर भार न आणता राबवणार आहे.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close