
विटा : गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ मराठा आरक्षणाचे पुरावे असतानाही सरकारने स्वतः च्या बुडा खाली का लपवून ठेवले. असा थेट सवाल राज्यकर्त्यांना सकल मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे – पाटील यांनी केला. २४ डिसेंबर पर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला देतो. म्हटले आहेत. तरी ही त्यांना जाग आणण्यासाठी एक डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण करावे, असे आवाहन जरांगे – पाटील यांनी केले
विटा (ता.खानापूर) येथील स्व. यशवंतराव चव्हाण पुतळ्या समोरील चौंडेश्वरी चौकात सकल मराठा समाजाच्या झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या जरांगे – पाटील बोलत होते. यावेळी समन्वयक प्रदीप साळोखे, संयोजक शंकर मोहिते प्रमुख उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे – पाटील यांनी आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात राज्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवली.
जरांगे – पाटील म्हणाले, ७० वर्षांपूर्वी मराठ्यांना आरक्षण दिले असते तर मराठ्याची जात प्रगत झाली असती. आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. आरक्षणाअभावी आमच्या लेकरा बाळांच्या जागा हडप केल्या. आरक्षणाने आमच्या लेकरांचा घात केलाय. ओबीसी नेत्यांचा दबाव राज्य सरकारवर होता. आरक्षणाचे पुरावे असताना सरकारने बुडा खाली ठेवले. मराठ्यांची एकजूठ बघून सरकारने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या नेत्यांना तुम्ही आम्ही मोठं केलं. ते नेते मराठ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत. सरकारला २४ डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा कायदा पारित करावा लागेल. अन्यथा १ डिसेंबर पासून गावागावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे. मागे हटू नका, गावे पिंजून काढा असे आवाहन जरांगे – पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना केले.
ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील जनता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जागी होत नाही, अशी ओरड होती. त्यास विट्यात होत असलेल्या सभेने चपराक दिली आहे. मराठा आरक्षणाचा लढा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. मराठ्याशी कधीही गद्दारी करणार नाही. मराठ्याची औलाद आहे. डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा कायदा करावा लागेल. कुणीही आत्महत्या करू नका , शांततेत आंदोलन करा. जो पर्यंत आरक्षणाचा कायदा होत नाही, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. आपल्या मध्ये मतभेद पडू देऊ नका. आपल्या मध्ये मतभेद पाडण्याचे काम सुरू आहे. त्यांचे षडयंत्र उधळून लावा.
यावेळी डॉ. जितेश कदम, प्रभाकर पाटील, हर्षवर्धन देशमुख (आटपाडी), राहूल पाटील (चिंचणी अं.), शिवाजी शिंदे, विठ्ठल साळुंखे, दादासाहेब यादव (कडेपूर), दहावीर शितोळे, राजू जाधव, तानाजी मोहिते, विकास जाधव, सचिन जाधव, शशिकांत शिंदे, हणमंतराव देशमुख (दिघंची ), जगन्नाथ पाटील, रविंद्र कदम, संदीप मुळीक, अशोक साळुंखे, विजय सपकाळ, दिशांत धनवडे, विनोद पाटील, अजय पाटील, अजित जाधव, मनोज देवकर, पंकज दबडे, अनिता पाटील (आटपाडी), शौर्या पवार, शुभांगी कुलकर्णी, शोभा भूमकर, प्रतिभा काटकर यांच्यासह हजारो मराठा बंधाव उपस्थित होते. देविदास यादव यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. शाहिर दिलीप सावंत (कोल्हापूर) यांच्या शाहिरी गायनाने सभेत रंगत आणली.
कडेकोट बंदोबस्त
मनोज जरांगे पाटील यांची सांगली जिल्ह्यातील पहिली सभा होत असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडू नये , यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा महाजन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.