
कराड : तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यानजीक पहाटेच्या सुमारास मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाल्याची घटना घडली.
दरम्यान, तासवडे टोल व्यवस्थापन, महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतकार्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. बसमधील ५५ प्रवासी सुखरुप आहेत. दरम्यान, या घटनेत बसचे अंदाजे २० लाख रुपयांचे, तर प्रवाशांचे प्रवासी बॅगेतील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, डाॅल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस ही प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, ही बस पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जात असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही बस तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बस चालकासह इतर वाहनधारकांनी बस चालकासह प्रवासी व तासवडे टोल व्यवस्थापनाला दिली.
त्यावेळी तासवडे टोलचे शिफ्ट इन्चार्ज यांनी आपल्या टोल कर्मचारी सहकाऱ्यांच्या व महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून गाडीतील प्रवाशांना खाली उतरून मदतकार्यासाठी नजीकच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर पोहचली. अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्यानंतर सुमारे तासभर सुरु असलेली आग काही वेळातच आटोक्यात आली. या आगीत बसचे सुमारे वीस लाख रुपयांचे व प्रवाशांच्या प्रवासी बॅगेतील साहित्याचे मोठे नुकसान झाले.