अध्यादेश मिळाला, नवी मुंबईतूनच गुलाल उधळत घरी जाणार : मनोज जरांगे पाटील

मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे
त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.
मध्यरात्री सरकारचं शिष्टमंडळाने नवीन अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितले. यानंतर मनोज जरांगेंनी सरकारच्या या निर्णयाबाबत मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर आपण आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. समाजाला विचारून मी हा निर्णय घेतला आहे. मी मराठा समाजाला मायबाप मानलं आहे, मी मुलगा म्हणून काम करतो, असं मनोज जरांगे म्हणाले.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन देखील सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.