ताज्या बातम्याराजकियराज्य

महाविकास आघाडीमध्ये वाद, नाना पटोलेंना काँग्रेसचा धक्का? दिल्लीतून आली मोठी अपडेट

नवी दिल्ली : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला गेले होते. महाराष्ट्रातल्या उमेदवार निवडीसाठी आणि मविआतल्या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस हायकमांड आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीतून मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे, त्यामुळे काँग्रेस हायकमांडने नाना पटोलेंना धक्का दिला का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या बैठकीत नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाद झाले, यानंतर नाना पटोले असतील त्या बैठकीला हजर राहणार नसल्याचा पवित्रा ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. महाविकास आघाडीमध्ये हे वाद सुरू असतानाच काँग्रेसचे नेते दिल्लीत गेले, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चाही थांबल्या होत्या. यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने नवी जबाबदारी सोपवल्यामुळे उद्यापासून जागा वाटपाच्या चर्चा पुन्हा सुरू होणार आहेत.

बाळासाहेब थोरात हे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत. आजची बैठक व्यवस्थित पार पडली असून अनेक नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. ही नावं एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर होतील. आणखी एक सीईसीची बैठक होईल, त्यात बाकी नावं फायनल होतील, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर दिली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलायला सांगितलं आहे. उद्या मी त्यांच्याशी चर्चा करेन, तिढा म्हणता येणार नाही, चर्चा होईल चर्चेतून मार्ग निघेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. उद्या दुपारी 3 वाजता आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहोत, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close