सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही
संजय राऊतांच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्याने टीका केली तरी त्याला हटके शैलीत अजित पवार उत्तर देतात.
महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजितराव हवा बहुत जोर से बेह रही है… टोपी उड जायेगी!, अशी टीका संजय राऊत यांनी पुण्यामध्ये बोलताना केली होती. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय.
महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय. राज्यातून काही उद्योग उद्योग बाहेर गेलेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत. म्हणून हे असे मुद्दे काढण्यात येत आहे. कालच मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकलं. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही, असं अजित पवार म्हणालेत.
डीपीडीसीच्या निधी वाटपावरून भाजपच्या डीपीडीसी सदस्यांनी लेखी नाराजी व्यक्त केली होती. तसं पत्र विभागीय आयुक्तांना दिलं होतं त्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात डीपीडीसीच्या निधी वाटपाचं सूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरवलं आहे . त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्याविषयी कोणाचं काही म्हणणे असेल तर मला माहिती नाही, असं अजित पवार म्हणालेत.