कृषीराज्यसांगली,सातारा

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

कराड : उसाला पहिला हप्ता प्रतिटन साडेतीन हजार रूपये मिळावा, मागील हंगामातील उसाला ४०० रूपयांप्रमाणे दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक खंडित झाली.

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे. मात्र, साखर कारखान्याकडून या मागणीला अद्याप अनुकूलता दर्शवण्यात आलेली नाही. शेतकरी संघटनेने मागील हंगामातील दुसरा हप्ता व चालू हंगामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार रूपयांची मागणी केली आहे. मात्र, याबाबत कारखानदारांकडून कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी झालेल्या चर्चेच्या दोन फेर्‍या निष्फळ ठरल्याने आज चक्काजाम आंदोलन हाती घेण्यात आले.

इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा येथे, गुहागर विजापूर मार्गावरील पलूस येथे, पलूस मार्गावरील नांद्रे येथे कवठेमहांकाळ मार्गावरील शिरढोण येथे आणि बोरगाव फाटा, तुरची आदी ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक खंडित झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गत हंगामात इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना चांगला पैसा मिळाला असल्याने यातील ४०० रूपये प्रतिटन देण्याची आमची मागणी असून यंदा साखरेलाही बाजारात चांगला दर असल्याने यंदाच्या हंगामात पहिला हप्ता साडेतीन हजार रूपये मिळावेत या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरू असून कोणत्याही परिस्थितीत हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close