2014 ला लागलेली “पनवती” 2024 ला दूर होणार
खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदे व पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई ः सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूहृदय सम्राट आहेत. शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतीलही, हिंदूहृदय सम्राट म्हणण्यासारख शिंदेनी काय काम केलं आहे, हे आम्हाला पाहावं लागेल. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यांनी जो संघर्ष केला आहे तो आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केल्या नाहीत. बेईमान शिंदे कधीपासुन हिंदूहृदय सम्राट झाले. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल असही त्यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांमध्ये दोन कॅप्टनसह चार जवानांना बलिदान द्यावं लागलं. याबाबत पंतप्रधान, गृहमंत्री ना संरक्षण मंत्री यांच्याकडुन संवदेना व्यक्त केली गेली नाही. केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना राजकीय विरोधकांना उखडवून टाकायचं आहे. काँग्रेसमुक्त भारत करायचं आहे. शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा होता पण त्यांना ते जमलं नाही. आम्हाला काश्मीर दहशतवादी मुक्त करायचा होता. पण तिथे अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद संपलेला नाही. कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहे 56 इंचांची छाती, कुठे आहेत गृहमंत्री? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
राजस्थानच्या जालोर येथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘टीम इंडिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण या ‘पनौती’मुळे (अपशकून) पराभव पत्करावा लागला.’ यानंतर हा शब्द खुप चर्चेत आला आहे. आता हा शब्द संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी वापरला आहे. माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची ‘पनौती’ आहे. ते महाराष्ट्रातही हरणार आणि बाहेरही.” पुढे बोलत असताना ते म्हणाले की,”2014 ला लागलेली “पनवती” 2024 ला दूर होणार आहे.