विधानसभा अध्यक्ष निवाडा देणार कळल्यापासून पत्रकार पोपटलाल यांच्यासह प्रत्येकजणाने वेगवेगळे सूर लावून रडायला सुरुवात केली
भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल सुनावणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नार्वेकरांचा निकाल हा मॅच फिक्सिंग असणार अशी टीका केली जात आहे.
त्यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे. ‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं? अशा शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरेंचा चिमटा काढला आहे.
आशिष शेलारांनी ट्विट करून म्हटलंय की, आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते. नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू, जुगाड करुन मुख्यमंत्रीपद मिळविले, तरीही रडगाणे सुरूच, पक्षप्रमुख होते तेव्हाही आमच्या नावाने रडत होते. पक्ष उभा फुटला तेव्हाही रडणे कायम होते. मुख्यमंत्रीपद गेले, तेव्हाही रडणे सुरूच…बरं, भाजपाने देशातील अनेक राज्यं जिंकली तेव्हाही रडतच होते. राम मंदिर उभे राहिले, मग निमंत्रण नाही म्हणून रडायला लागले. कुठल्याही निवडणुका लागल्या की, झाली यांची रडायला सुरुवात असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा त्यांच्या बाजूने आला, तेव्हाही रडणे सुरुच होते आणि आज..विधानसभा अध्यक्ष निवाडा देणार असे कळले, तेव्हापासून तर पत्रकार पोपटलाल यांच्यासह प्रत्येकजणाने वेगवेगळे सूर लावून रडायला सुरुवात केली आहे. मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं? छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। मन हारकर, मैदान नहीं जीते जाते ही अटल बिहारी वाजपेयींची कविता पोस्ट करून शेलारांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.