मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

मुंबई : मी महायुतीमध्ये असलो तरी माझी विचारधारा ही सेक्युलरच आहे. मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार असून मूळ विचार कधीच सोडणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
ते सोशल मीडिया टीमला संबोधित करत होते.
अजित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मीडियाचा वेग थक्क करणारा आहे. शून्य मिनिटात बातमी पोहोच होत आहे. कोरोना काळामध्ये मोबाईलवर बातमी वाचायला सुरुवात झाली अन् वृत्तपत्रांचा खपदेखील कमी झाला. काळानुरूप बदल होत असतात. आत्ता सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या पक्षाने कसा सोशल मीडियाचा उपयोग केला, हे संपूर्ण देशाने बघतलं आहे.
”सध्याच्या आभासी जगात काहीही बातम्या दिल्या जातात आणि नंतर काढून टाकल्या जातात. असं असलं तरी लोक बघतात आणि विचार करतात. सगळ्यांकडे फोन आणि इंटरनेट आहेच. भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या ५३ कोटी आहे. तर You tube वापरणाऱ्यांची संख्या ४८ कोटी आहे. शिवाय इतरही सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे.”
अजित पवार पुढे म्हणाले, सोशल मीडिया हे एक दुधारी हत्यार आहे. एखादी चूक झाल्यानंतर टीव्ही चॅनलवाले रिपीट करून २०-२५ वेळा दाखवतात. खोटी गोष्ट ५० वेळा दाखवली सांगितली तर ती खरी वाटायला लागते. अनेकांना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. काहींनी चुका केल्या तरी त्यांच्या बातम्या येत नाहीत, हे सांगायची गरज नाही. मतदारांकडे पोहोचण्याकरीता सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
”आत्ताची पिढी Facebook वर फारशी नसून ट्विटर आणि यूट्यूबवर आहे. त्यांच्यानुसार भाषा आपल्याला वापरावी लागते. त्यांना डोळ्यासमोर ठेऊन आपण सगळं करत असतो. राजकारण हा परफेक्शनचा खेळ आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, काय विचार करतात याला महत्त्व आहे. रोज सकाळी एक पुडी सोडून द्यायची आणि मग ती घरोघरी पोहचते, असं देखील काही लोक करतात.”
पवार म्हणाले की, महायुतीत असलो तरी फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आपली आहे. त्यांचे विचार मी कधीच सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू या माँ जिजाऊ आहेत, ही माझी नाही तर आमच्या पक्षाची भूमिका आहे. सध्या वातावरण गढूळ करण्याचं काम काही जण करत आहेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही जणांचं सुरू आहे.
”एकनाथ शिंदे जाणार होते तेव्हाच अशोक चव्हाण जाणार होते, असं विरोधी गटातील नेते बोलत आहेत. सोशल मीडियावर जर कोणी काही बोलत असेल आपली बदनामी करत असेल तर त्यांची गया करू नका रीतसर तक्रार करा. सोशल मीडिया टीमला सगळं सहकार्य केलं जाईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील, असा माझा अंदाज आहे.” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.