
कराड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व थोर हुतात्म्याने भारतीय लोकशाही निकोप व्हावी म्हणून निवडणुकीची पद्धत दिली. मात्र कदाचित भारताच्या आजूबाजूच्या शत्रूकडून भारतीय लोकशाहीला धोका पोहोचणार नाही. मात्र निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय ? अशी भीती थोर साहित्यिक पानिपतकार विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केली. तर अशा पार्श्वभूमीवर लोकांना स्पष्टपणे न्याय देणाऱ्या भूषण गवई एका झुंजार न्यायमूर्तीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार हा जणू थोर हुतात्म्याचा आशीर्वादच आहे.
येथील स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त व ४३ वा स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी सैनिक मेळावा आणि यावर्षीचा स्वातंत्र्य दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मान चिन्ह सन्मानपत्र व रोख ५१ हजार रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमास मेघालय हायकोर्टाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती रणजीत मोरे मुंबई हायकोर्टाचे सेवानिवृत्ती न्यायमूर्ती प्रदीप देशमुख पाटील, अँड उदयसिंह उंडाळकर, अँड विजयराव पाटील उंडाळकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वासराव पाटील म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर हुतात्म्यांने त्यागाचे बलिदान दिले. आज त्यांच्या त्यागामुळे समाजव्यसस्था उभारली असली तरी सामाजिक विषय आहेत. त्याचा आशय आपण विसरता कामा नये अन्यथा आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आपल्या आजादीच्या लढाईची प्रथरणा केली असे ठरेल. पूर्वी तुझी जात कोणती? हे विचारले जायाचे . आता तुझा धर्म कोणता म्हणून विचारले जात आहे. भगवान बुद्ध, भगवान महावीर, शिवाजी महाराज, महात्मा गांधी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या दृष्टीने माणूसकीचा धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळे कुठलाही धर्म मोठा असू शकत नाही.
सेवानिवृत्त सर न्यायाधीश भूषण गवई म्हणाले, स्वतंत्र भारतीय लढ्यात अग्रणी असणाऱ्या दादासाहेब उंडाळकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी महात्मा गांधींच्या व यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे २४ ऑगस्ट रोजी काढलेला मोर्चा हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. सत्याग्रह व भूमिगत आशा दोन पद्धतीने स्वातंत्र्य लढ्याची उभारणी करणेत आली होती. यशवंतराव चव्हाण साहेब हे भूमिगत तर दादासाहेब उंडाळकर हे सत्याग्रह पध्दतीने लढा देत होते. आज त्यागाची भूमी असणाऱ्या उंडाळे गावात थोर स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात आलेला दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार हा थोर साहित्यिक विश्ववासराव पाटील यांचे हस्ते प्रदान केला त्याबद्दल त्यांनी स्मारक समितीचे आभार मानून पुरस्काराची रोख रक्कम ५१ हजार इतक्या रक्कमेचा धनादेश स्मारक समितीला देण्याचे जाहीर करून ही रक्कम दहावी च्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात देण्यासाठी स्मारक समितीला धनादेश दिला.
प्रास्ताविक व स्वागत अँड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे परिचय करून देण्यात आले. तर आभार प्रा. धनाजी काटकर यांनी मानले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, वकील रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


