
कराड : कटपानमळा परिसरातील रस्त्याच्या कामामुळे सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी अस्तित्वात असलेला डांबरी रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी उकडून काढला, मात्र त्या ठिकाणी नवीन डांबर टाकून रस्ता पूर्ण करण्याचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न केवळ कामातील विलंबाचा नसून, संपूर्ण प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे.
पूर्वीचे डांबर काढून टाकल्यानंतर त्या जागी नवीन रस्ता करण्याची अपेक्षा असताना, काम अर्धवट अवस्थेतच सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असून, दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्ता उकडून ठेवून पुढील काम न केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
या ठिकाणी रस्ता करू नये याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कराड यांच्याकडे कोणत्याही शेतकरी किंवा ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिलेली नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर अशी कोणतीही लेखी हरकत नोंदवलेली नसेल, तर काम थांबविण्याचा निर्णय नेमका कोणत्या कारणावरून घेतला गेला, हा प्रश्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे, जर कोणी तोंडी तक्रार देत असेल की रस्ता करू नये, तर केवळ अशा तोंडी आक्षेपाच्या आधारावर अधिकृत काम थांबविणे योग्य ठरू शकते का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे. शासनाच्या प्रक्रियेनुसार कोणतीही हरकत लेखी स्वरूपात नोंदवली गेली तरच तिचा विचार होणे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत लेखी तक्रारच नसताना तोंडी बोलण्याला किती अधिकृत महत्त्व दिले गेले, आणि त्यावर काम थांबविण्याचा निर्णय घेतला गेला का, याबाबत संभ्रम अधिकच वाढत आहे.
रस्ता उकडण्याचा निर्णय घेताना संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी, नियोजन आणि पुढील कामाचा आराखडा स्पष्ट असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काम थांबलेले दिसत असल्याने प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
कॉन्ट्रॅक्टदारांकडून मंजूर काम पूर्णत्वास नेणे ही मूलभूत जबाबदारी असताना, केवळ जुने डांबर काढून पुढील टप्पा प्रलंबित ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे कामाच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणेकडून स्पष्ट उत्तरांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या ग्रामस्थांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती उघड करावी, तसेच उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. रस्ता हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक बनले आहे.
पुढील भागात – आमदार नसताना अतुल बाबांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला होता

