आजवर देशात अनेक दिग्गज नेते होऊन गेले कुणालाही तडीपार केलं नव्हतं : शरद पवार

मुंबई : शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्राने संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती. तसंच १९७८ पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने २० फूट गाडलं अशी टीका केली होती. आज या सगळ्या टीकेचा शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. आजवर देशात अनेक दिग्गज नेते होऊन गेले कुणालाही तडीपार केलं नव्हतं, शरद पवारांचा टोला
देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते. आपल्या शेजारचं राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या प्रशसकांचं वैशिष्ट्य होतं, की यापैकी कुणालाही तडीपार केलं गेलं नाही. आज त्या नेत्यांची मला आठवण होते आहे असं शरद पवार म्हणाले.
देशाच्या गृहमंत्र्यांनी शिर्डीत भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीबहुत माहिती घेऊन भाषण केलं तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. १९७८ चा संदर्भ देऊन अमित शाह यांनी माझी आठवण झाली. १९७८ पासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्यांना कदाचित माहीत नसेल १९७८ मध्ये म्हणजे ४० वर्षांपूर्वी अमित शाह नक्की कुठे माहीत नाही. १९७८ मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू आडवाणी असे जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. १९७८ च्या पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. हशू आडवाणी नगरविकास मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान लोक माझ्या बरोबर काम करत होते असा टोला शरद पवार यांनी लगावला.
आणखी दोन नावं मी घेऊ इच्छितो, त्यांनी संघाची पार्श्वभूमी असताना आम्हाला सहकार्य केलं. त्यात वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख मी करु इच्छितो. ही सगळी नेतृत्वाची फळी १९७८ आणि त्यानंतरच्या काळात दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगळे होते पण दोन वेगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची नावं घेता येतील. त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केलं नाही. भूजला भूकंप झाला तेव्हा देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात भूकंप, अतिवृष्टी या संकटांमध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी आपात्कालीन स्थितीत काय केलं पाहिजे यावर चर्चा झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींनी माझं नाव आपात्कालीन स्थितीत काय करता येईल याबाबत शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं सुचवलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षाचा असताना मंत्र्याचा दर्जा देऊन मला ते काम सोपवलं होतं. ही पार्श्वभूमी अलिकडच्या लोकांना माहीत नसावं. मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे उल्लेख झाले त्याबाबत एक मराठीत म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हण मला आठवते असं म्हणत शरद पवार यांनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.
उद्धव ठाकरेंबाबतही त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्ही पाहिलं. उद्धव ठाकरे हे त्याबाबत त्यांचं मत मांडतील. हे गृहस्थ जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा मुंबईत आले, बाळासाहेबांच्या घरी ते गेले होते. या गृहस्थांना सहकार्य करावं अशी विनंती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. यापेक्षा अधिकची माहिती उद्धव ठाकरे सांगतील असाही टोला शरद पवार यांनी लगावला. दुर्दैवाने पातळी घसरली किती ते सांगायला ही उदाहरणं पुरेशी आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्यांची नोंद त्यांच्या पक्षातही घेतली जाणार नाही असं मला वाटतं असा टोलाही शरद पवारांनी लगावला.