
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कथित चुकीच्या कारभाराविरोधात तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज ३७ वा दिवस आहे. आंदोलन शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने सुरू असतानाच तक्रारदार तथा आंदोलक यांनी २३ जुलै २०२६ रोजी चौकशी समिती व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर सर्व कागदपत्रे, पुरावे आणि सविस्तर म्हणणे अधिकृतरीत्या सादर केले असल्याचे सांगितले आहे.
आंदोलकांनी स्पष्ट केले की, आजपर्यंत चौकशी समितीविरोधात एकही वैयक्तिक आरोप करण्यात आलेला नाही. चौकशी समितीला कोणताही दबाव जाणवू नये, त्यांच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये आणि चौकशी पूर्णपणे निष्पक्ष व्हावी, या हेतूनेच आजपर्यंत संयमाची भूमिका जाणीवपूर्वक घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, या संयमाचा अर्थ आंदोलन कमकुवत आहे, आंदोलक काहीच करू शकणार नाही किंवा आंदोलनात बसलेल्या व्यक्तीला चौकशीतील घडामोडींची माहिती नसते, असा गैरसमज चौकशी समितीने अजिबात करून घेऊ नये, असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, आंदोलन सुरू आहे म्हणून चौकशीला अनावश्यक विलंब झाला, वेळकाढूपणा करण्यात आला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना अप्रत्यक्ष लाभ होईल अशा प्रकारे प्रक्रिया लांबविण्यात आली, तरी आंदोलकाच्या ते लक्षात येणार नाही, असा कोणताही समज वस्तुस्थितीपासून दूर आहे. आंदोलनाची पुढील दिशा, कायदेशीर रणनीती आणि पुढील टप्प्यांचे नियोजन आधीपासून निश्चित असून, योग्य वेळी योग्य पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांनी असेही म्हटले आहे की, चौकशी समितीवर दबाव आणल्याचा आरोप होऊ नये म्हणूनच आजपर्यंत शांतता राखली आहे. परंतु त्या शांततेचा अर्थ मौन, भीती किंवा असहाय्यता नसून, निष्पक्ष चौकशीला संधी देण्याची भूमिका आहे. त्यामुळे या भूमिकेचा चुकीचा अर्थ लावला गेला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांवर राहील.
चौकशी समितीने तक्रारदारांनी सादर केलेल्या प्रत्येक कागदपत्राची, प्रत्येक नोंदीची आणि प्रत्येक पुराव्याची सखोल शहानिशा करूनच वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. उपलब्ध पुराव्यांकडे दुर्लक्ष करणे, वस्तुस्थितीची अपूर्ण पडताळणी करणे किंवा कोणाचाही बचाव होईल असा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे प्रशासकीय व कायदेशीर परिणाम संबंधितांनाही भोगावे लागू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
” आंदोलन यांनी असेही म्हटले आहे की आजपर्यंत चौकशी समितीचा आदर ठेवला आहे; म्हणून समितीनेही त्या विश्वासाचा आदर राखत निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत चौकशी पूर्ण करावी. संयमाला कमजोरी समजण्याची चूक करू नये. आंदोलनाचा प्रत्येक दिवस नोंदवला जात आहे आणि चौकशी प्रक्रियेतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे,” असे आंदोलकांनी म्हटले आहे.
आंदोलकांनी शेवटी स्पष्ट केले की, जर सादर केलेल्या पुराव्यांची निष्पक्ष पडताळणी न करता वस्तुस्थिती झाकण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे चुकीचा अहवाल सादर करण्याचा प्रयत्न झाला, तर उपलब्ध सर्व कायदेशीर उपायांचा अवलंब करून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. त्यावेळी केवळ संबंधित प्रकरणच नव्हे, तर चौकशी प्रक्रियेतील उत्तरदायित्वाचाही प्रश्न उपस्थित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.



