शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आगीत तेल ओतण्याचे काम करू नये : प्रकाश आंबेडकर

लातूर : शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता आगीत तेल उतरण्यासाठी उतरले आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नामांतराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका केली.
प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव रॅली लातूरमध्ये होती. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर हा गंभीर आरोप केला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून चर्चेत आहे. मनोज जरांगेंनी त्यासाठी लढा उभा केला. त्यानंतर त्यांना सरकारने आरक्षण दिलं. मात्र त्यांना ते आरक्षण मान्य नाही. आम्हाला सगेसोयऱ्यांसह ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे अशी मनोज जरांगेंची आग्रही मागणी आहे. ज्यानंतर काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन केलं. दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे का? त्यावर शरद पवारांसह इतर दोन पक्षांची भूमिका काय? असं विचारलं. मात्र त्यावर शरद पवारांनी थेट उत्तर दिलेलं नाही. आता प्रकाश आंबेडकर यांनी हाच मुद्दा उपस्थित करत शरद पवार आगीत तेल ओतत असल्याचं म्हटलं आहे.
“शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल उतरण्यासाठी उतरले आहेत. शरद पवार आगीत तेल ओतत आहेत. नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारण काय? नामांतर होऊन इतकी वर्षे झाली आहेत. फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का? हा मुद्दा आत्ता उपस्थित करुन शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे? नामांतराचा मुद्दा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. त्या मुद्द्याला शरद पवार ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते या माध्यमातून करत आहेत.” असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील रॅलीदरम्यान शरद पवार हे आरक्षणाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत असा गंभीर आरोप केला आहे. आता या आरोपाला शरद पवार उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मनोज जरांगे यांनाही प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंनी २८८ जागा लढवल्या पाहिजेत, त्यांची मागणी मान्य झाली नाही तर त्यांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे. सर्वसामान्य मराठ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मनोज जरांगेंनी २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठ्यांचे प्रश्न दाबून टाकतो आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमधून त्यांना दिला आहे.